आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज; 2 हजार 300 पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर – मंगळवार, 20 जुलै आषाढी एकादशीदिवशी पहाटे 2.20 ते 3.30 या वेळेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची शासकीय पूजा होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात पुजेसाठी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे व त्यांच्यासमवेतील अन्य व्हीआयपी व्यक्तींना वगळता धार्मिक विधी पार पाडणाऱ्या पुजाऱ्यांबरोबरच इतर सर्व वारकऱ्यांना करोना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

पंढरपूर आषाढी वारीसाठी केवळ चारशे वारकऱ्यांनाच परवानगी दिलेली असताना बंदोबस्तासाठी मात्र 2 हजार 300 पोलिसांची फौज तयार करण्यात आली आहे. 144 कलमानुसार संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर शहराबरोबरच नदीपात्र व घाट परिसरात मोठ्या संख्येने पोलिसांची गरज असून हा बंदोबस्त वारकऱ्यांसाठी नाही तर संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचीच बंदोबस्तासाठी नियुक्ती केली गेली आहे.

आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शनिवारपासून 25 जुलै रोजीच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत पंढरपूर शहर व गोपाळपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सज्ज झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर आषाढी वारीवर करोनाचे सावट आहे. यंदाही मर्यादित स्वरुपातच आषाढीचा सोहळा साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली असून केवळ चारशे वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. परवानगी दिलेल्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरीत प्रवेश करण्यास व चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी दिली असून या सर्व पालख्या 19 जुलै रोजी वाखरी येथे दुपारी 3 पर्यंत दाखल होणार आहेत.

याठिकाणी सर्व संतांच्या भेटी होऊन सर्व पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतील. यावेळी प्रतीकात्मक पायी वारी सोहळा होणार असून वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर सर्व मानाच्या पालख्यांचे 40 वारकरी पायी पूर्ण करतील, तर इसबावी ते पंढरपूर या दरम्यान 20 वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पायी वारी होणार असून इतर 380 वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.

3 दिवसांची संचारबंदी
पंढरपूर शहर व गोपाळपूर वगळता भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी आदी गावांमध्ये मात्र 18 ते 22 जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. सुरुवातीला एक दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण तीन दिवस या गावांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मदतीने 10 तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले असून त्याठिकाणी शंभर बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात 50 कोविड तर 50 नॉनकोविड बेडचा समावेश आहे. सात रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.