पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला : सबनीस

कात्रज/ पुणे – वांझ राजकारण आणि करंटे धर्मकारण अशा काळात पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले.

भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी कुलगुरु एस.एफ. पाटील, विचारभारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए.बी. जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, विचारभारतीच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी खेड्यातल्या मातीला आणि माणसांना शहरी संस्कृतीत प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विकासाचे राजकारण आणि सत्याचे समाजकारण केले. ज्ञान, विज्ञान आणि समाज परिवर्तनाचे प्रयोग शिक्षण विश्‍वात रुजवले. माणसातला माणूस पूजला. शिक्षणाचा ध्येयवाद भारताचा नकाशा ओलांडून परदेशात पोहोचवला, असे सबनीस म्हणाले.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते हे डॉ. पतंगराव कदम यांनी स्वत: अनुभवले होते. आपल्या वाट्याला जे आले, ते पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली.

महानगराबरोबरच ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षण केंद्रे उभे करून तेथील घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे काम भारती विद्यापीठाने केले, असे जोशी म्हणाले. ज्योती मंडलिक यांनी सूत्रसंचालन केले. तर, डॉ. सगरे यांनी आभार मानले

Leave a Comment