PM Modi On World Cup : “140 कोटी भारतीय विजयाचा जयघोष करत आहेत”, पंतप्रधान मोदींनी दिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला शुभेच्छा

PM Modi On World Cup : गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 1 लाख 30 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये हा सामना पार पडत आहे. देशभरात तर उत्साहाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. दरम्यान, या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.  पंतप्रधानांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे ज्यात,”140 कोटी भारतीय टीम इंडियाचा जयजयकार करत आहेत” असे म्हटले आहे. तसेच “टीम इंडियाचे अभिनंदन, 140 कोटी भारतीय तुमचा जयजयकार करत आहेत. तुम्ही चांगले खेळा आणि खेळाची भावना कायम ठेवा.” असे म्हणत त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल.

दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय सघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.