नगर | कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण

कोपरगाव (प्रतिनिधी):  कोपरगाव बेट भागातील प्रति त्र्यंबकेश्वर समजल्या जाणाऱ्या कचेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवाची तयारी सुरू आहे. अंतर्गत साफसफाई व रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. भाविकांनी जास्तीत- जास्त संख्येने या पर्वकाळात दर्शन सोहळयासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश सचिव व कचेश्वर देवस्थानचे वंशपरंपरागत व्यवस्थापक पुजारी रमेश उर्फ काशिनाथ भाउराव क्षीरसागर यांनी केले आहे.

कचेश्वर मंदिर अतिशय पुरातन व ऐतिहासिक आहे. त्यांच्या दुरुस्तीबाबत जिल्हाधिकारी तसेच पुरातन वास्तू विभागाकडे पाठपुरावा सुरूआहे. तीर्थक्षेत्र अंतर्गत या देवस्थानचा विकास व्हावा, अशी अनेक भाविकांची मागणी आहे.

गुरू शुक्राचार्य यांच्याकडून संजीवनी मंत्राची दिक्षा कचेश्वरांनी येथेच घेतली. संपूर्ण भारतभूमीत कोपरगाव बेट भागात कचेश्वराचे हे एकमेव मंदिर आहे. शिवरात्रीनिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे.

पुण्यक्षेत्र पुणतांबा चांगदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यास जाताना कचेश्वरी संत निवृत्तीनाथ, बहिण मुक्ताई, पंढरीचा पांडुरंग यांनी मुक्काम करून पुढे नेवासा येथे वास्तव्य केल्याचा उल्लेख नामदेव गाथेत असून, यास्थानाला विशेष महत्व आहे. ब्रम्हलिन शिवभक्त अरविंद महाराज हे कचेश्वरी नियमित दर्शनास येऊन त्याबाबतचा प्रचार प्रसारात अग्रेसर असायचे.

त्रंबकेश्वर तीर्थक्षेत्री होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम कचेश्वरी केल्यास सिध्द होतात, असे प्रमाण वर्षानुवर्षे मानले गेले आहे. यास्थानावर कालसर्पशांती, त्रिपिंडी, नारायण नागबळी, ग्रहशांती, विवाह आदि धार्मिक कार्यक्रम विनामुहूर्त होतात.

ब्रम्हलिन संत रामदासीबाबा यांनी कचेश्वरी छत्रीचा जीर्णोध्दार करून रूद्रयाग करत या स्थानाची माहिती संपूर्ण भारतभर पसरविली. त्यांचे येथे अनंतकाळ वास्तव्य होते.

पाचशे वर्षाच्या इतिहासात अयोध्येत भगवान श्रीरामप्रभूचे मंदिर उभे राहिले, त्याची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते संपन्न झाली. त्यानिमित्त जगात हा सोहळा पार पडला. त्यावेळेपासूनच कचेश्वर देवस्थानची स्वच्छता करून महाशिवरात्र पर्वकाळात हे स्थान अधिक सज्ज ठेवले आहे.