“४ जूननंतर देशातील दोन पक्ष लोप पावतील” ; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा, वाचा सविस्तर

Prithviraj Chavan । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे.   महाराष्ट्रातील ११ जागांवरील  उमेदवारांचे भवितव्य उद्या ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. दरम्यान, प्रचारकाळात महाविकास आघाडी व महायुती या राज्यातील दोन्ही आघाड्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. त्यातच निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष कुठेही दिसणार नाहीत, असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना हा दावा केलाय. “सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल एवढा चांगला निकाल मविआच्या बाजूने लागेल. जीएसटी, महागाई, बेरोजगारी हे लोकांच्या जीवनाशी निगडित प्रश्न आहेत. नेते काय सांगतात यापेक्षा मोदी नकोत ही एक सुप्त लाट आहे. मोदींची तारांबळ झाली आहे. धावपळ होत आहे. जर तुम्ही ४०० पारचा नारा दिला आहे, तुमचं निर्विवाद बहुमत येणार असेल तर तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चौकशी का करत आहात?” असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

“तुमचं सरकार येणार हे निश्चित असेल तर Prithviraj Chavan ।

पुढे भाजपविषयी बोलताना,“तुमचं सरकार येणार हे निश्चित असेल तर तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा. त्यांना पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नसलेले विषय घेऊन ते बोलत आहेत. जी भाषा त्यांनी शरद पवार, राहुल गांधींबाबत वापरली, त्यामुळे १० वर्षं सत्तेत असलेली व्यक्ती आपल्या १० वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेत नाहीच. पण अपूर्ण आश्वासनं पूर्ण करणार का? यावरही काही बोलत नाहीत. ते भाजपाच्या जाहीरनाम्याबाबत बोलत नाहीत. फक्त काँग्रेस आली तर तुष्टीकरण होईल, तुमचं मंगळसूत्र घेऊन जातील, तुमच्या घरातली एक खोली घेऊन जातील अशी अनेक न पटणारी, लोक चक्रावून जातील अशी विधानं पंतप्रधान करत आहेत”, असे चव्हाण म्हणाले.

“या दोन पक्षांमधली माणसं…” Prithviraj Chavan ।
“महाराष्ट्रात आज सहा पक्ष आमने-सामने आहेत. तीन-तीन दोन्ही बाजूला. या लोकसभा निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील. कुठेतरी विलीन होतील, त्यातली माणसं दुसरीकडे जातील. पण दोन पक्ष दिसणार नाहीत. ही माणसं कुठे जातील ते आत्ता मी सांगत नाही. पण दोन पक्ष दिसणार नाहीत”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.