पुणे जिल्हा : सत्ताधारी गटाला धक्का देत सोरतापवाडीच्या सरपंचपदी स्नेहल चौधरी यांची निवड

सोरतापवाडी : हवेलीतील तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहल विठ्ठल चौधरी यांची 9 विरुद्ध 6 मतांनी निवड झाली आहे.

सत्ताधारी गटाला धक्का देत दोन मते फोडण्यास सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या गटाला यश आले. संध्या अमित चौधरी यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत स्नेहल चौधरी व पूनम नवनाथ आढाव यांचा सरपंचपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आला होता.

उपस्थित 15 सदस्यांमध्ये गुप्त मतदान घेण्यात आले. यात स्नेहल चौधरी यांना 9 तर पूनम नवनाथ आढाव यांना 6 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी तर सहायक म्हणून प्रभारी ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, तलाठी निवृत्ती गवारी यांनी कामकाज पाहिले.

या वेळी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, युवा नेते सागर चौधरी, बाळासाहेब चौधरी, मनोज चौधरी, माजी सरपंच संध्या चौधरी, विलास चौधरी, सनी चौधरी, शशिकांत भालेराव, शंकर कड, निलेश खटाटे, सुप्रिया चौधरी, अश्विनी शेलार, सोनाली लोंढे आदी ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या 15 जागा असून, सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली के. डी. चौधरी पुरोगामी ग्रामविकास पॅनेल तर राष्ट्रवादी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी उपसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी व राष्ट्रवादीचे युवा नेते अजिंक्य रामदास चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडी यांच्यात सरळ लढत झाली होती. तर तीन जागा बिनविरोध झाल्याने, निवडणूक झालेल्या 11 जागांपैकी भाई के. डी. चौधरी पुरोगामी पॅनेलला 4 जागा मिळाल्या होत्या. तर सोरतापेश्वर ग्रामविकास पॅनेल व शिवशंभो ग्रामविकास आघाडीने 7 जागांवर विजय मिळवता आला होता.

 सहा दशकानंतर सत्तांतर
सोरतापवाडी ग्रामपंचायतीत तब्बल सहा दशकानंतर सत्तांतर घडले होते. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी व माजी सरपंच सागर चौधरी यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात 60 वर्षांनंतर विरोधकांना यश आले होते; पण आत्ता सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सुदर्शन चौधरी व सागर चौधरी यांनी सत्ताधारी गटाची दोन मते फोडण्यास यश मिळवून सरपंचपद पुन्हा आपल्या गटाकडे आणण्यास यश मिळविले आहे.