पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यातील शेतकरी सुखावला

टँकर सुरू असलेल्या गावांना दिलासा

सविंदणे – शिरूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात शनिवारी (दि.८) रात्री ११ च्या दरम्यान मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच पावसामुळे टँकर सुरू असलेल्या कान्हूर मेसाई, पाबळ, केंदूर परिसरातील गावांतही पावसाने हजेरी लावल्याने या गावांनाही थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील टाकळी हाजी, सविंदणे, कवठे येमाई, पाबळ, मलठण, पिंपरखेड, न्हावरे, मांडवगण फराटा परिसरातील गावांमध्ये (दि.८) रात्री उशिरा पावसाने दमदार हजेरी लावली. शिरूर शहराप्रमाणे तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली.

या पावसामुळे उकाडा कमी होण्यास मदत झाली असून अशाच दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक गावातील वीज गायब होती. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. यंदा तीव्र उन्हाळा जाणवत होता. त्यातच पाण्याची टंचाई तसेच चाऱ्याचा प्रश्न भीषण बनला होता.

आता पावसाला सुरुवात झाल्यामुळे पावसाचा जोर जर असाच राहिला तर काही प्रमाणात दुष्काळी भागातील पाणीटंचाई कमी होणार आहे. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे तीन तास हा पाऊस बरसला. अनेक दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.