पुणे जिल्हा : वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन

विविध मागण्यांसाठी 20 दिवसांपासून संप सुरू
पुणे –
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांनी गेले 20 दिवसांपासून विविध मागण्यासाठी संप सुरू केला आहे. या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप योग्य प्रकारे दखल न घेतल्याने आपल्या मागण्यांसाठी ठाम राहत सुमारे 630 कामगारांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले.

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरचे नाव आजही सातासमुद्रा पार घेतले जाते. ‘इस्रो’च्या 50 वर्षांच्या यशस्वी भागीदारीचा सुवर्ण महोत्सवी क्षण आणि चंद्रावर स्वारी करण्यात यशस्वी ठरलेल्या ’चांद्रयान 3’, मिशन आदित्यनंतर गगनयान मोहिमेमध्ये क्रु एस्केप सिस्टीम जेटीसनिंग ही मोटर पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीने तयार केलेल्या यानाची यशस्वी चाचणी झाली. गेल्या पन्नास वर्षात भारताच्या चंद्रावरच्या प्रत्येक मोहिमेत वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी सहभागी झाली आहे.

अशा कंपनीमध्ये गेले काही दिवसांपासून कंपनी कामगार संघटना यांच्याकडून विविध मागण्यांसाठी यापूर्वी वालचंदनगर पोलीस स्टेशन मदत केंद्रलगत धरणे आंदोलन केले होते. यानंतर गेले काही दिवसांपूर्वी वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील आयएमडी कामगार समन्वय संघाकडून संप पुकारण्यात आला आहे. या संपाला 20 दिवस पूर्ण झाले आहे. कामगारांनी शांततेमध्ये संप करण्याचा निर्धार केला असून दररोज एक तास युनियनच्या कार्यालयासमोर एकत्र बसून चर्चा करीत आहेत.

यासंदर्भात आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की, वेतनवाढीच्या कराराची मुदत 3 वर्षांची असते. मात्र व्यवस्थापन वेळेमध्ये करार पूर्ण करीत नाहीत. दीड ते दोन वर्षे वेतनवाढीचा कराराची बोलणी सुरु ठेवून करार जाणीवपूर्वक रखडवला जातो. यापूर्वीचे करार देखील असेच रखडवून कामगारांना मेटाकुटीस आणून केले आहेत. याउलट व्यवस्थापनाचा वेतनवाढीचा कराराला एक महिनाही विलंब न होता प्रत्येक वर्षी वेळेमध्ये होतो. जुलै 2023 मध्ये व्यवस्थापनातील कर्मचार्‍यांना दुसर्‍यांदा भरगच्च (भरीव) वेतनवाढ दिली; मात्र कामगारांच्या वेतनवाढीचा करार संपून 16 महिने झाले आहेत.

आत्तापर्यंत 21 बैठका झाल्या आहेत. मात्र कामगारांच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसून कामगारांवर व्यवस्थापन अन्याय होत आहे. तसेच कामगारांची तीन पगार व इतर देणी थकीत असताना व्यवस्थापनातील अधिकार्‍यांचे एकाचदिवशी दोन पगार करुन कामगारांच्या जखमेवरती मीठ चोळल्याचा प्रकार घडला असल्याचे सांगून कामगारांनी व्यवस्थापनातील अधिकार्‍यांचा निषेध करुन अर्धनग्न आंदोलन केले.
 कामगारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
यावेळी आयएमडी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष कपिल गायकवाड व जनरल सेक्रेटरी शहाजी दबडे यांनी सांगितले की, कामगारामध्ये अफवा पसरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहे. अफवा पसरवून कामगारांमध्ये फूट पाडण्याचे कटकारस्थान सुरु आहे; मात्र कामगार अफवेला बळी पडणार नाहीत. कामगारांचे एकजूट भक्कम आहे. कामगार संघटना वेतवाढीचा करार व कामगारांच्या मागण्यावरती ठाम असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावरती न जाण्याचा निर्धार केला आहे. कामगारांच्या पाठीशी संघटना कायम उभी राहणार आहे. येणारा काळ कामगारासाठी निश्‍चित सुवर्णकाळ असून कामगारांनी सयंम बाळगण्याचे आवाहन केले.