पुणे जिल्हा : खडकवासलातून इंदापूरला अर्धा टीएमसी पाणी

पालकमंत्री अजित पवार यांचे अधिका-यांना निर्देश
नागरिकांच्या आंदोलनाला यश
इंदापूर –
इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे-कळस-रूई-कौठळी-बिजवडी-तरंगवाडी भागातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत खडकवासलातून पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती.

तसेच पाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गही रोखला होता. अखेर नागरिकांच्या आंदोलनास आणि आमदार भरणेंच्या पत्रव्यवहारास यश आले आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी खडवासातून इंदापूरसाठी अर्धा टीएमसी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

ज्येेष्ठ नेते प्रतापराव पाटील, भाजपचे रमेश खारतोडे, बाळासाहेब भांडवलकर, कृती समितीचे अध्यक्ष विजय गावडे, विनोद पोंदकुले, तुषार गावडे, राहुल खारतोडे, स्वप्नील पाटील, विशाल खोमणे, नवनाथ सांगळे आदी शेतकर्‍यांनी एकत्र येत खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 31 मे) डाळज नं.2 येथे पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून दुष्काळाची परस्थिती पाहता लवकरात-लवकर खडकवासल्यातून अर्धा टीएमसी पाणी मिळावे म्हणून पालकमंत्री अजित पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन या शिष्टमंडळाने विनंती केली होती.

त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून आमदार दत्तात्रय भरणे व खडकवासला कालवा पाणी संघर्ष समितीच्या मागणीची दखल घेऊन खडकवासल्यातून इंदापूर तालुक्यासाठी तात्काळ अर्धा टीएमसी पाणी सोडण्यासंबंधीचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे या परिसरातील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून काही अंशी जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍न सुद्धा मार्गी लागणार आहे.