पुणे जिल्हा : “भारताची सागरी क्षेत्रात महाशक्‍तीकडे वाटचाल” ; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मत

लोणी काळभोर – भारताला मोठा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे समुद्र हा कायमच आपल्या संपत्ती व समृद्धीचा स्त्रोत राहिलेला आहे. त्यात भारतातील 85 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खलाशी हे विदेशातील सागरी क्षेत्रात कार्यरत असून त्यात महिला खलाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भारत सागरी क्षेत्रातील महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहे. हाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिभाषेतील देशाचा अमृतकाळ आहे असे मत बंदर, परिवहन व जलमार्ग खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिजाईन व टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या महाराष्ट्र ऍकेडमी फॉर नॅवल एज्युकेशन व ट्रेनिंग(मॅनेट)च्या जागतिक सागरी सप्ताहानिमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिपिंग विभागाचे महासंचालक श्‍याम जगन्नाथन, सिनर्जी मरिन ग्रुपचे कॅप्टन डॉ शशांक जहागिरदार, शिपिंगचे उपमहासंचालक डॉ पांडूरंग राऊत, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा डॉ मंगेश कराड, कुलसचिव डॉ महेश चोपडे, कॅप्टन आशा अलगप्पा, कॅप्टन केदार चौधरी, कॅप्टन श्रीरंग गोखले, संजीव ओगले, सुहास मते,मिनिनाथ झगडे, उदय पुरी, उदय सुभेदार, राजाराम लहाने, गजानन केंद्रे उपस्थित होते.

नाईक म्हणाले, मर्चेंट नेव्हीमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने ट्रेनिंग दरम्यान 1 लाखांची शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे अधिकाधिक महिलांना या क्षेत्राकडे वळविण्याचा सरकारचा मानस आहे. एमआयटी मॅनेट ही मर्चेंट नेव्ही क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य संस्था आहे. तरी मॅनेटच्या सप्ताहाच्या माध्यमातून मी सर्व कॅडेट्‌सला जागतिक सागरी दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. श्‍याम जगन्नाथ यावेळी म्हणाले,

मॅरिटाईम महाशक्ती म्हणून भारत वाटचाल करत असल्याने कॅडेट्‌सला या क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्कीच या क्षेत्राकडे वळायला हवे. तसेच मॅनेट या संस्थेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे हे ऐकून आनंद झाला, असे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनी मर्चंट नेव्हीकडे वळावे- कराड
मेरिटाईम हा जगातील अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. त्याचा जागतिकीकरणात मोठा वाटा आहे. भारतातील सागरी व्यवसायाला वास्को द गामा पासून मोठा इतिहास आहे. परंतू सध्या आयटी क्षेत्रातील नोकरीच्या वाढत्या संधींमुळे विद्यार्थी मर्चंट नेव्हीकडे दुर्लक्ष करीत आहेत. ही नोकरी आव्हानात्मक असली तरी ती प्रचंड मानसन्मान मिळवून देणारी देखील आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे वळले पाहिजे. मॅनेटच्या माध्यमातून एमआयटी एडीटीने आत्तापर्यंत 3400 पेक्षा अधिक अधिकारी घडविल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे मत प्रा. डॉ. मंगेश कराड यावेळी मांडले.