PUNE : भारती विद्यापीठ पोलिसांकडून नांदेडची टोळी जेरबंद; मजुर अड्डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने लूटले

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी नांदेडच्या एका टोळीस अटक केली. त्यांनी मजुर अड्‌डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने आडबाजूला नेऊन लूटले होते. त्यांच्या ताब्यातून 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहरात इतरत्र अशा प्रकारे घडलेल्या घटनांत त्यांचा सहभाग आहे का? याची तपासणी केली जात आहे. नितीन साहेबराव चव्हाण (30 ), संतोष नागोराव कानोडे (20), सुकलाल बाजीराव गिरी (19 ) सुनिल नारायण गिरी (19,रा. वारजे माळवाडी, मुळ ता. आर्धापुर, जिल्हा नांदेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 24 जून रोजी फिर्यादी महिला व तिचे सहकारी यांना आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून प्रवासी चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगदयाचे पलीकडे नेले. तेथे गाडीतुन उतरुन डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नेले. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्यांना दमदाटी करत अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हॅन्डसेट रोख रुपये असा 76 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला होता. तपासात आरोपी निष्पन्न झाल्यावर त्यांना ताब्यात घेऊन चोरी केले दोन सोन्याचे मंगळसुत्र, दोन जोड कानातील फुले असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बिबवेवाडी परिसरातही अशीच एक घटना घडली होती. त्याचीही चौकशी आरोपींकडे करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीषकुमार दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ यांनी सांगितले की, “यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नांदेड येथे गुन्हा दाखल आहे. मजूर अड्डयावरील महिलांच्या अंगावर एखादा दुसरा तरी दागिणा असतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी कात्रज येथील मजूर अड्डयावरुन महिलांना कामाचे आमिष दाखवून आडबाजूला नेले होते. जाताना त्यांना चौकातील शेअर रिक्षातून नेण्यात आले होते.”