Pune: ‘नीट’ चौकशी करा; परीक्षा गैरव्यवहाराबाबत आपची मागणी

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी करावी. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. तसेच काही मुलांना ग्रेसमार्क दिले गेले आहेत अशी याबाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सी या परीक्षा घेणाऱ्या संस्थेने स्पष्टीकरण दिले आहे.

परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ज्या परीक्षेवर अवलंबून आहे, अशा मुलांतील सुमारे १ हजार ५०० मुलांना असे ग्रेसमार्क दिले गेल्यामुळे इतरांवर अन्याय होणार आहे. या परीक्षेच्या संदर्भात तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात सुद्धा पेपर फुटी, भ्रष्टाचार याचे आरोप महाराष्ट्रात केले गेले आहेत. तलाठी परीक्षा, पोलीस, वनविभाग, आरोग्य, जलसंपदा या सर्वच विभागातील निवडीच्या संदर्भात लाचखोरीचेही आरोप केले गेले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये याविषयी तीव्र संताप आहे.

आता या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधील निकाल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि इतर राज्यातील मुलांना चांगले गुण दिले गेल्यामुळे महाराष्ट्रातील मुलांवरही अन्याय होणार आहे. विविध राज्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे ठिकाण ठरत आहेत. नीट परीक्षेच्या दरम्यानही बिहारमध्ये पेपर फुटीची प्रकरणे घडलेली असताना शासनाने त्यावर कुठलेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये काही लपविण्याबाबतची शंका निर्माण झाल्याचे मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.