PUNE: ‘टाटा’चे पाणी मुळशीकरांना मिळण्यासाठी याचिका

पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने किमान १ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे. जर १ टीएमसी पाणी दिले तर जवळपास ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात दि. २४ जानेवारी रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दि. ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

ब्रिटिशांच्या काळात १९१५-२७ दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशी तालुक्यात मुळशी, लोणावळा, वळवणं, शिरोटा, कुंडली आणि ठोकरवाडी, अशी सहा धरणे बांधली गेली. ही धरणे टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात असून, या धरणांमधून वीजनिर्मिती केली जाते. शतकापूर्वी टाटा पॉवर कंपनीने भिरा, भिवपुरी आणि खोपोली येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभे केले. यासाठी टाटा कंपनीने पश्चिम बाजूचे पाणी हे भिरा, भिवपुरी आणि खोपोली या जलविद्युत केंद्रांकडे वळविले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून मावळ-मुळशी तालुक्यातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याकरिता मुळशी धरणातील पाणी हे मुळशीतील २४ गावे, हिंजवडी परिसरातील १३ गावे आणि कोळवणमधील ११ गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी सातत्याने संबंधित खात्यांकडे करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या जल-जीवन मिशनअंतर्गत मुळशी रिजनल वॉटर सप्लाय ही योजना मंजूर करण्यात आली.

या मिशनचे जिल्हाधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पाणी ही मूलभूत गरज असून, या नैसर्गिक संसाधनावर सर्वाचा समान अधिकार आहे. जर १ टीएमसी पाणी दिले तर जवळपास ५० गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी अमित कंधारे यांनी अॅड. कृष्णा मोरे, अॅड. हेमंत निवंगुणे व अॅड.जाधव यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.