Pune: प्रदेश काँग्रेसच्या दुष्काळ आढावा समितीची २ जूनला कराड येथे होणार बैठक

पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील दुष्काळी स्थितीचा तालुका निहाय आढावा घेण्यासाठी विभागीय समित्या नियुक्त केल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बारा आमदारांचा समावेश करण्यात आला असून समितीचे समन्वयक म्हणून पुण्यातील काँग्रेस नेते संजय बालगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीची प्राथमिक बैठक येत्या 2 जून रोजी कराड येथे होणार आहे. या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील समितीचे सर्व 13 सदस्य उपस्थित राहतील. यात दुष्काळाच्या संबंधात प्राथमिक आढावा घेऊन सविस्तर आढाव्यासाठी दौऱ्याचे नियोजन केले जाईल.

त्यानंतर दुष्काळी स्थितीचा सविस्तर आढावा अहवाल प्रदेश काँग्रेस समितीला सादर केला जाणार आहे अशी माहिती या समितीचे समन्वयक संजय बालगुडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.