रेल्वेकडून पुढील 6 महिन्यांसाठी करोना मार्गदर्शक तत्त्वे जारी!; दुर्लक्ष केल्यास भारी दंड भरावा लागणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा नियम करोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान त्याकडे दुर्लक्ष करू नका.

सध्या देशात कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी होत आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. केंद्र सरकारने जारी केलेल्या अलर्ट अंतर्गत, पुढील तीन महिने अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यामुळेच अत्यंत काळजीघ्यावी लागणार आहे. केंद्राच्या म्हणण्यानुसार, निष्काळजीपणामुळे करोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते. या संदर्भात सर्व विभागांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेच्या करोना महामारीबाबत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वातील कठोरता अजूनही अबाधित आहे. हेच कारण आहे की रेल्वेने करोना महामारीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे पुढील 6 महिन्यांसाठी वाढवली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वात मास्कची अनिवार्य आवश्यकता देखील अबाधित आहे.

* रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हे मार्गदर्शक तत्व पूर्वीही होतेच, आता ती पुढील 6 महिन्यांसाठी म्हणजेच एप्रिल 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने सांगितले, प्रवाशांना विनंती केली जाते की प्रवास सुरू होण्यापूर्वी विविध राज्यांनी जारी केलेल्या आरोग्य सल्लागार मार्गदर्शक सूचना वाचा.

* पुढील तीन महिने सण आणि लग्नाशी संबंधित हंगाम आहेत, ज्यामुळे गर्दी वाढू शकते. सणासुदीच्या काळात रेल्वे परिसर किंवा प्लॅटफॉर्मवर गर्दी होण्याची शक्यता आहे. वास्तविक, रेल्वेने दिवाळी आणि छठ सणामुळे विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत बुकिंग वाढेल आणि प्लॅटफॉर्म किंवा रेल्वे परिसरात गर्दी होईल. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अतिशय गरजेचे आहे.

* 17 एप्रिल 2021 पासून रेल्वेकडून 500 रुपयांचा दंड लागू करण्यात आला, जो 6 महिन्यांसाठी होता. याला आणखी 6 महिन्यांनी 16 एप्रिल 2022 पर्यंत वाढविण्यात आली. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना सूचना दिल्या आहेत.