राज्यात पुन्हा मास्क कम्पलसरी; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

मुंबई – करोनामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात नसलेली मास्क सक्ती पुन्हा एकदा होऊ शकते, असे सूचक वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मुंबईत बेस्टच्या कार्यक्रमात बोलताना राज्यात परत मास्क वापरावा लागणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी मास्कसक्ती हटवण्यात आली होती. मात्र, देशातील अनेक भागात करोनाने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरू केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

राज्यात अद्याप स्थिती नियंत्रणात असून आमचे स्थितीवार बारकाईने लक्ष असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. मात्र चौथ्या लाटेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही राज्यांमध्ये रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

दिल्लीसह काही राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्याही काही जिल्ह्यांत मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच अन्य राज्यांनीही खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. मध्यंतरी केंद्राने काही राज्यांना सावधगिरीची सूचना केली होती. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मास्कबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. आता मुख्यमंत्र्यांनीच थेट सूचक विधान केले आहे.