सातारा | मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा

कोयनानगर –  लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे असा प्रचार मी करुनसुध्दा उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही.

उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता जाऊन त्यांना सूज व सुस्ती आल्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचा बॉम्ब टाकून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात खळबळ उडवून दिली.

सातारा लोकसभा मतदारसंघात पाटण तालुक्यातून महायुतीच्या उदयनराजे भोसले यांच्या पाटण तालुक्यातील मताधिक्यात घसरण होऊन विरोधी शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर येथील शताब्दी स्मारकामध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पवार, अभिजित पाटील, भरत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख सावळाराम लाड, विजय शिंदे, अजय देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पाटण तालुक्यातून मताधिक्य घटले याचे शल्य आहे. उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता जनतेला व कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात संघटनेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पांडुरंग नलावडे यांनी आभार मानले.

लोकसभेचे अपयश पालकमंत्र्यांना विधानसभेचे आव्हान असे विश्‍लेषण दै. प्रभातने ७ जून रोजी प्रसिद्ध केले होते. यामध्ये शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदामुळे सूज व सुस्ती आली आहे. ती सूज व सुस्ती उतरवण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालून गावोगावच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे ऑपरेशन केले तर सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.