पुणे जिल्हा | खडकवासल्यातून इंदापूरसाठी पाणी सोडा

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची ही तीव्र टंचाई जाणवत आहे. हातातोंडाशी आलेली शेतात असणारी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत.

याची गंभीर दखल घेत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे खडकवासल्यातून इंदापूर साठी पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे.

आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जवळपास सगळीकडीलच नैसर्गिक स्रोत यंदा लवकर आटल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट जाणवत आहे. अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाणीयोजना बंद पडल्या आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ब-याच भागातील उन्हाळी पिके जळून गेली आहेत.

पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावोगावी निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकवासल्यातुन इंदापुरसाठी पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री अजित पवार यांना केली असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

या गावांमध्ये टँकर सुरू
शेटफळगढे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, वायसेवाडी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी, रूई, थोरातवाडी, मराडेवाडी, बोराटवाडी, कौठळी, बळपुडी, खामगळवाडी, बिजवडी, पोंदकुलवाडी, तरंगवाडी या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असून सध्या या परिसरात पाण्याचे टँकर चालू आहेत.