Sagar Sharma : संसदेत घुसून घोषणाबाजी करणाऱ्या सागर शर्माचे आईसोबतचे शेवटचे शब्द; म्हणाला होता,”मी आता….”

Sagar Sharma : संसदेत काल सुरक्षा व्यवस्थेत अक्षम्य चूक घडली होती. संसदेत धुराचे लोट पसरवून बाहेर घोषणा करणाऱ्या आरोपी सागर शर्माला पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पोलीस सागर शर्मा याच्या घरी पोलीस गेले होते. सागर शर्मा हा लखनऊचा रहिवासी आहे. त्याने घरुन दिल्लीला येताना काय सांगितलं होतं ती माहिती आता समोर आली आहे.

लखनऊ पोलिसांनी सागर शर्मा याच्या विषयी दिलेल्या माहितीनुसार, सागर शर्मा हा भगत सिंग यांना आपला आदर्श मानत होता. तर हिंदू धर्माविरोधात तो पोस्टही करायचा. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अशा अनेक पोस्ट पोलिसांना सापडल्या आहेत. सागर शर्मा हा लखनऊच्या मानक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगरचा रहिवासी आहे. तो इ रिक्षा चालवत होता. सागर शर्माच्या कुटुंबीयांनी हे सांगितले आहे की, तो दिल्लीत आंदोलन करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र कुणालाही हे माहीत नव्हतं की तो संसदेत जाऊन असे काही करणार आहे.

“मी दिल्लीला जातो आहे. काहीतरी मोठं घडवून आणणार आहे” असे  सागरने त्याच्या आईने सांगितले होते. एका हिंदी वृत्तवाहिनीने या विषयीचे वृत्त दिले आहे. सागरच्या बहिणीनेही हे सांगितलं आहे की, सागर आईशी बोलत होता तेव्हा मी ऐकलं की तो दिल्लीला काहीतरी आंदोलन करायला जाणार आहे. तो काय करणार आहे हे कुणालाही माहीत नव्हतं. याआधी तो कधीही असं वागला नव्हता. त्यामुळे तो काय करणार आहे ठाऊक नव्हतं असेही त्याच्या बहिणीने सांगितले आहे.

मानकनगर पोलीस ठाण्याचे अधीक्षक शिव मंगल सिंह यांनी,”सागर शर्मा हा २८ वर्षांचा तरुण त्याच्या आई-वडिलांसह आणि बहिणीसह रामनगर भागात भाडे तत्वावर घेतलेल्या घरात राहतो. त्याचे वडील काम करतात. तर सागर ई रिक्षा चालवतो. मागच्या दहा वर्षांपासून हे सगळे रामनगरमध्येच राहात आहेत. लोकसभेत ज्यांनी धुराचे लोट पसरवले त्यापैकी एक आरोपी हा सागर शर्मा आहे तर दुसरा आरोपी मनोरंजन डी आहे. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

१३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबरच्या दिवशीच संसदेवर हल्ला झाला होता. लष्कर -ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्याच दिवशी ही घटना घडली. ज्यानंतर एकच गदारोळ झाला. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले. सुरक्षा दलांनी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर UAPA च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.