राज्यातील शाळा बंद राहणार : राजेश टोपे

मुंबई – राज्यातील मोठया शहरांसह ग्रामीण भागातही करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्‍यता नाही. करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत.

सध्या करोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील करोना परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. टोपे म्हणाले, करोना कमी होत असल्याचे समजू नये. मुंबई आणि पुण्यात करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. राज्यात आज 46 हजार करोना रूग्णांची नोंद झाली आहे. 14 टक्के करोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. करोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील करोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.

दुसरीकडे लसीकरणाचे प्रमाण घटत आहे. सध्या राज्यात रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आधी हे प्रमाण 9 ते 10 लाख होते. लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लसीकरणासाठी राज्य पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्राकडे लशींची मागणी करण्यात येणार आहे.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यावेळी कोव्हिशिल्डचे 60 लाख आणि कोव्हॅक्‍सिनचे 40 लाख डोस देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल. राज्यात सध्या पहिला डोस घेतलेले 90 टक्के तर दुसरा डोस घेतलेले 62 टक्के लोक आहेत.