लग्नाच्या आमिषाने शरीरसंबंध म्हणजे फसवणूक नव्हे; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

मुंबई – सज्ञान व्यक्‍तींनी दीर्घकाळ परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्यास ती फसवणूक होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या शिक्षा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली.

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे शरीरसंबंध ठेवल्यानंतर या तरुणाने लग्नास नकार दिला होता. त्यामुळे फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा या तरुणावर नोंदवला होता. कनिष्ठ न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली त्या तरुणाला मुक्‍त केले होते. मात्र, त्याला फसवणुकीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली होती.

न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली.
न्यायालयाने काशीनाथला फसवणुकीच्या आरोपामधूनही मुक्‍त केले आहे. सर्व साक्षी, पुरावे, जबाब आणि युक्‍तिवाद ऐकून घेतल्यानंतर काशीनाथ आणि ही महिला तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

तसेच या महिलेने दिलेल्या जबाबावरून तिची फसवणूक करून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्याचे आढळले नाही असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. पूर्ण युक्‍तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात आरोपी असणाऱ्या प्रियकराने खोटी माहिती किंवा फसवणूक करून शरीरसंबंध ठेवल्याचे दिसून आले नाही. त्यामुळेच एवढ्या मोठ्या कालावधीसाठी नात्यामध्ये राहून शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिल्यास त्याला फसवणूक म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल देताना वरिष्ठ न्यायालयामधील निकालाचे दाखलेही दिले. अशा प्रकरणांमध्ये आरोपीने खोटी माहिती देऊन महिलेला लग्नाचे आमिष दाखवले किंवा आश्‍वासन दिले हे सिद्ध होणे गरजेचे असते. आधी खोट्या माहितीच्या आधारे आश्‍वासने दिली आणि नंतर ती पूर्ण केली नाहीत तर त्याला फसवणूक म्हणता येईल, असेही न्यायालयाने म्हटले.