शिरूर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर तालुक्यातून आमदार बाबूराव पाचर्णे यांना पूर्णपणे नाकारले आहे. विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या आमदारकीच्या काळातील विकासकामे व त्यांनी केलेले योग्य नियोजन याचाच विजय असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. शिरूर विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे मत सर्वच जाणकारांचे होते. परंतु ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी झाली आहे. माजी आमदार पाचर्णे यांच्या काळात त्यांनी 3 हजार कोटींहून जास्त विकासकामे झाल्याची बोलले होते. परंतु त्यांच्या काळात झालेला विकास कुठे दिसत नव्हता. ठोस कामही त्यांच्या काळात झालेली कुठे दिसले नाही. त्यामुळे मतदारराजांनी मतपेटीतून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत पाचर्णे यांनी मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग भाजपामध्ये करून घेतले होते. शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रोड शो त्यांनी घेतला होता. याला प्रतिसाद मिळाला होता. परंतु या रोड शोचा परिणाम मताधिक्यामध्ये झाला नाही. पाचर्णे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अण्णापूर, रामलिंग, कर्डिलवाडी, या पाचपैकी तीन गावांनी विद्यमान आमदार अशोक पवार यांना मताधिक्य दिले. त्यामुळे पाचर्णे यांचा बालेकिल्ला पूर्णपणे ढासळला. त्याच शिरूर शहरातून त्यांना मताधिक्य देखील मिळेल, असे वाटत असताना प्रथमच शिरुरू शहरातून पवार यांना 441 चे मताधिक्य मिळाले. पहिले तीन ते चारमध्ये पाचर्णे यांचा पराभव होणार हे निश्चित झाले होते.
आमदार पवार यांना न्हावरे, मांडवगण जिल्हा परिषद गटातून मताधिक्य मिळाले. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर कोरेगाव भीमा, सणसवाडी भागातून पवार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शिरूर तालुका संपल्यावर पवार यांनी 23 ते 24 हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यात पुढे लोणीकंद गटातून पवार यांनीच बाजी मारली. केवळ लोणीकंद गाव सोडले तर कुठेही जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा करिश्मा दिसून आला नाही. हवेली तालुक्यातील वाघोली हे पाचर्णे यांचा बालेकिल्ला आहे.
तिथेही पाचर्णे यांना मतदारांनी नाकारले. दोनशे ते तीनशेचे त्यांना मताधिक्य दिले. त्यानंतर हवेलीतील सर्वच गावांनी व सोलापूर रोडवरील गावांनी पवार यांना डोक्यावर घेतले. हा विजय म्हणजे पाचर्णे यांच्या काळातील न झालेली विकासकामे याविरूद्ध अशोक पवार यांच्या काळात झालेली विकासकामे यांचा तुलनात्मक अभ्यास करून मतदारांनी परिवर्तनाचा कौल दिला आहे.