कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून टीका

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर विरोधकांकडून वेळोवेळी टीका होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यासर्व परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांना त्यांच्या कोणत्याचं समस्येवर उत्तर मिळत नसल्याने त्यांच्यासमोर मरणाशिवाय पर्याय राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. लोकांच्या या समस्या राज्य सरकार सोडू शकत नसल्याने सरकारने हात वर केल्याचा आणि सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

कोरोनाच्या या कठिण काळात जनतेने आता जावे तरी कोणाकडे, असा सवालदेखील यावेळी  महाजन यांनी उपस्थित केला आहे. कोरोनाचा प्रसार सर्वत्र वाढत असताना कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची चाचणी केली गेली पाहिजे, ती केली जात नसल्याने कोरोनाचा प्रसार अधिक वाढत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना कोरोना चाचणी सक्तीची केली पाहिजे असा सल्ला देखील  महाजन यांनी दिला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोनाची लस मिळत नसल्याने राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. पण आधी राज्य सरकारने बाधित झालेल्या रुग्णांच्या बाबत उचारासाठी काय उपाय योजना केल्या, त्याबाबत सांगावे, आणि मग केंद्राकडे बोट दाखवले पाहिजे. याकाळात राजकारण करत बसल्याने लोकांचे नाहक जीव जात आहेत. या सर्व परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असून, कोरोनाचा संपूर्ण विषय हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.