पुणे जिल्हा | दहावीतील विद्यार्थ्यांची उरुळीत आत्महत्या

उरुळी कांचन, (वार्ताहर) – वडील रागावल्याच्या किरकोळ कारणावरून दहावीला असलेल्या एका 16 वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मंगळवारी (दि. 16) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली श्रीराज उर्फ (टिंग्या) संतोष सोनावणे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

याप्रकरणी त्याचे चुलते सतिष साहेबराव सोनावणे (वय 51) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. श्रीराज हा कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन येथील शाळेत शिक्षण शिकत होता. त्याच्या कुटुंबीयांसोबत उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात राहतात. वडील शिवाजीनगर येथील एका खासगी बँकेत नोकरीला आहेत.

मंगळवारी वडील संतोष सोनावणे हे गाडीच्या कारणावरून श्रीराज याला रागावले आणि बाहेर गेले होते. यानंतर श्रीराज हा घराच्या शेजारी असलेल्या पत्रा शेडमधील अँगलला दोरीचे सहाय्याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईला दिसले. यावेळी श्रीराज याची आई सविता सोनावणे यांनी साडेसात वाजण्याच्या सुमारास सतीश सोनावणे यांना फोनवरून कळवले.

तात्काळ वडिल व चुलते घरी आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने त्याला खाली घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.