सुजय विखेंचे अमोल कोल्हेंना सडेतोड उत्तर; म्हणाले,”नगरच्या अग्नितांडवातील १२ रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?”

नवी दिल्ली : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर छापलेल्या मोदींच्या फोटोवरून बोलताना रुग्णाच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरही त्यांचा फोटो छापायची जबाबदारी घ्यावी लागेल असे  म्हटले होते. त्यावर सुजय विखेंनी प्रतिक्रिया देत कोल्हेंवर जोरदार पलटवार केला आहे.

“लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला गेला असेल मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी, एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याही मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? राजकारण करायची वेळ आली तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मग या हिशोबाने मला वाटतं सर्वात जास्त मृत्यू प्रमाणपत्रांवर महाविकास आघाडीच्या उद्ध ठाकरेंचे लागतील,” असे सुजय विखे म्हणाले.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात ओमायक्रॉन विषाणूच्या नव्या संकटाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी ओमायक्रॉनपेक्षा व्हायरल न्यूजचाच जास्त धोका असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच देशातील लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला जात असेल तर राज्यात घटलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो लावायला हवा असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

“करोना काळातल्या कामासाठी महाराष्ट्रातल्या सरकारच्या तिन्ही पक्षांच्या लोकांना भारतरत्न देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही लस सरकारने विकत घेतलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप बुस्टर डोसबाबत काही परवानगी दिलेली नाही. तरीही सरकारवर आरोप केले जात आहे.

पुढचा धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जाते. त्यातील किती लहान मुले पॉझिटिव्ह झाली? माझी सर्वांना विनंती आहे या सर्व विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे. गुगलमध्ये सर्च करुन भाषण करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे,” असे सुजय विखे म्हणाले.