अशी घ्या… उन्हाळ्यात पायांची काळजी

उन्हाळा सुरू झाला की जीव नुसता नकोसा होतो. भर दुपारच्या वेळी तर दूरच, पण सकाळीही घराबाहेर पडावेसे वाटत नाही. सारे नुसते भगभगीत, रखरखीत वाटते. रणरणत्या उन्हापासून बचावासाठी अनेक उपाय केले जातात. कूलर, फॅन यांचा वापर वाढतो. थंड पेये घेतली जातात. चेहऱ्याची काळजी घेतली जाते. त्यासाठी बाहेर जाताना मस्तक, चेहरा झाकला जातो. अंगभर कॉटनचे कपडे, गॉगल आणि हा सर्वात महत्त्वाचे सनस्क्रिन! हे लावल्याशिवाय कोणी घराबाहेर पडतच नाही. चेहऱ्यासाठीही अनेकविध प्रकारची क्रीम्स वापरली जातात. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून बाह्य उपचार आणि पोटात घ्यायचेही उपचार केले जातात.

पण या साऱ्यात शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव- थंडी-वाऱ्यात, उन्हा-पावसात आपल्याला सर्वत्र नेणारे आपले पाय, त्यांच्याकडे मात्र बरेच दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर चालताना असो वा गाडीवरून जाताना असो पाय तापतात आणि जर बूट शूज वापरत असाल, तर पाय नुसते उबून जातात. दिवसभर बाहेर राहिल्यानंतर संध्याकाळी तुम्ही घरी येता, तेव्हा घरात आल्यानंतर आपल्याला पाय आंबून गेल्याची जाणीव होते. दिवसभर पायात असलेल्या सॉक्‍सना वास येतो. दिवसभर उन्हात बाहेर भटकून संध्याकाळी परत घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या पायांकडे पाहता का? ऊन आणि धुळीमुळे पायांची काय अवस्था झाली आहे, त्याकडे लक्ष देता का? जरा नीट, काळजीपूर्वक पाहा पायांकडे. चपला वापरत असाल तर उन्हामुळे तुमचे पाय तुम्हाला काळवंडलेले दिसतात. म्हणजे चपला काढल्यानंतर त्यांचे चट्टेही पायावर स्पष्ट दिसू लागतात.

उन्हाळ्याच्या दिवसांत पायांच्या काळजीसाठी काही झटपट टिप्स. अगदी अवश्‍य अजमावून पाहाव्यात अशा-

  • बाहेरून आल्यानंतर पाय धुवायची आपल्यापैकी बहुतेकांना सवय असतेच, पण पाय धुताना शक्‍य झाल्यास कॉफी, शुगर, सॉल्ट स्क्रब असे स्क्रबदेखील आठवड्यातून एकदोनदा वापरल्यास उत्तम. स्क्रबमुळे तुमच्या पायांवरील मृत त्वचा निघून जाते.
  • तुमच्या चेहऱ्याला ज्याप्रमाणे मॉश्‍चरायझरची गरज असते, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या पायांनाही मॉश्‍चरायझर्सची गरज असते. कारण पायांना ऊन अधिक काळ लागत राहिले, तर पाय आपोआप शुष्क दिसू लागतात. शिवाय पायांवर अधिक सुरकुत्या दिसू लागतात. काळवंडलेल्या पायांपेक्षा शुष्क पाय असतील तर ते अधिक खराब दिसतात. त्यासाठी स्क्रब केल्यानंतर पायाला चांगले मॉश्‍चरायझर लावण्याची सवय ठेवा.
  • आपण सगळेच वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चपला-बूट घालत असतो. पण रोजच बूट घालतो, असे होत नाही. चपलांचाही वापर अधिक होतो. त्यामुळे चपला वापरताना शक्‍य असल्यास स्कीन कलरचे सॉक्‍स चपलांच्या आत घालणे उत्तम. त्यामुळे पायांना लावलेले मॉश्‍चरायझरही अधिक काळ टिकून राहील. पण घरी आल्यानंतर तुम्ही दिवसभर घातलेले सॉक्‍स धुणे महत्त्वाचे आहे. कारण दिवसभरात तुम्हाला आलेला घाम त्या सॉक्‍सने टिपला असेल. त्यामुळे साहजिकच त्यावर बॅक्‍टेरिया असतील म्हणून सॉक्‍स वापरणार असाल तर रोज स्वच्छ धुतलेले सॉक्‍स वापरा. उन्हाळ्यात पातळ सॉक्‍सची निवडही योग्य ठरेल. काळ्या रंगाचे सॉक्‍स मुळीच घालू नयेत; कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो.
  • सर्वसाधारणपणे थंडीत अनेकांना टाचा फुटण्याचा त्रास होतो, पण कडक उन्हाळाही अनेकांना बाधतो. अशा वेळी आपल्या पायांची काळजी घेणारे हिल प्रोटेक्‍टरही बाजारात मिळतात. ते अवश्‍य वापरावेत. त्यामुळे तुमच्या टाचा फुटणार नाहीत.
  • पायांच्या स्वच्छतेसाठी पेडिक्‍युअर महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात तुम्ही शक्‍य तो महिन्यातून किमान दोनदा तरी घरच्या घरी पेडिक्‍युअर करा. पेडिक्‍युअरमध्ये स्क्रबिंग, मॉश्‍चरायझिंग आणि मसाज देखील होऊन जातो. त्यामुळे पाय सुरक्षित राहून, पायांच्या सौंदर्यात अधिक भर पडते.
  • उन्हात बाहेर पडत असताना तोंड आणि हातांना लावता, त्याचबरोबर तुमच्या पायांनाही सनस्क्रीन लावा. त्याने सूर्याच्या किरणांचा त्यावर जास्त परिणाम होणार नाही. नेहमी चांगल्या प्रतीच्या सनस्क्रिनचा वापर करा.  उन्हाळ्यात काय आणि अन्य ऋतूंत काय, फिरायला, खरेदीला जायला सर्वांना आवडतं. पण जाऊन परत आल्यावर जो थकवा येतो, त्याने अगदी काही काम करायला नकोसं वाटतं. फिरून आल्यानंतरचा थकवा आपण काही वेळातच दूर करू शकता. त्यासाठी-

 

  • एका टबमध्ये कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून आपले दोन्ही पाय बुडवा. याने थकवा दूर होतं आणि चालताना सूज आली असल्यास त्यावरही राहात मिळते.
  • या लोकांना रात्री झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी हा प्रयोग नक्की अमलात आणावा. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडून ठेवावे.
  • या प्रयोगाने किडनीची एनर्जी वाढते.
  • याने रक्त प्रवाह सुरळीत होतं
  • संधिवाताची तक्रार असलेल्या लोकांनी पाण्यात दालचिनी आणि काळे मिरे टाकून पाय पाण्यात ठेवावे.
  • हा प्रयोग जेवण झाल्यावर करणे योग्य ठरेल.संधिवाताची तक्रार असलेल्या लोकांनी पाण्यात दालचिनी आणि काळे मिरे टाकून पाय पाण्यात ठेवावे.
  • हा प्रयोग जेवण झाल्यावर करणे योग्य ठरेल.
  • लो ब्लड प्रेशरची तक्रार असलेल्यांनी गरम पाण्यात पाय ठेवून बसू नये. मधुमेही रुग्णांनीपण हा प्रयोग करू नये.

मृणाल गुरव

Leave a Comment