सुप्रिया सुळे म्हणाल्या,”आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर..”

मुंबई : देशात सध्या इंडिया आणि भारत या नावावरून गदारोळ सुरु आहे. विरोधकांनी त्यांच्या आघाडीच नाव ‘इंडिया’ ठेवल्याने केंद्र सरकारने देशाचे नावच बदलण्याचा घाट घातला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर आता विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही हवं तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा टाकू नका अशी टीका त्यांनी यावेळी केली.

बीडच्या अंबाजोगाईत खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना नारायण दादा काळदाते स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान सुळे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून राज्य सरकार तर भारत आणि इंडिया च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.

याविषयी बोलताना,”आम्ही आमच्या आघाडीला इंडिया नाव दिलं. त्यामुळे आता जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा येणार आहे. आम्ही इंडिया नाव दिलं कारण हे चांगलं नाव आहे. पण इतके घाबरले आमचे विरोधक की ते आता इंडियाचं भारत करणार आहेत. माझी भाजपाला हात जोडून विनंती आहे हवं तर आम्ही नाव भारत ठेवतो पण तुम्ही इंडिया नाव बदलून जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा लादू नका” असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी,”माझी भाजपाला विनंती आहे की १४ हजार कोटी हे आमच्या गरीब मायबाप जनतेचे आहेत. हे पैसे नाव बदलण्यासाठी खर्च करु नका. १४ हजार कोटींमध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी देता येईल आजच्या अडचणीच्या काळात. १४ हजार कोटींमध्ये भारतात रुग्णालयं बांधता येतील. १४ हजार कोटींमध्ये देशभरात शाळा उभारल्या जातील. १४ हजार कोटींचा खर्च नाव बदलण्यासाठी येणार आहे असं मी वर्तमानपत्रात वाचलं त्यामुळे मोदी सरकारला आणि भाजपाला आवाहन करते आहे की जनतेचे हे पैसे फक्त नाव बदलण्यासाठी खर्च करु नका, असे त्यांनी म्हटले.