अकोले (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांचे वीज बिल, उर्वरीत बॅंक कर्ज रक्कम शंभर टक्के माफ व्हावे, शेतकऱ्यांना बांधावर खते – औषधे, बी- बियाणे मिळावे, तसेच शेतकऱ्यांच्या बांधावरच कांदा खरेदी व्हावी, अशा आशयाचे निवेदन अकोले नगरपंचायतच्या नगरसेवक सुभद्राताई संपतराव नाईकवाडी व स्वातीताई संदीप शेणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. करोना विषाणुने थैमान घातलेले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळेनासा झाला आहे. शेती पिकविण्यासाठी पाहिजे, त्या प्रमाणात शेतीची औषधे, खते न मिळाल्यामुळे देखील शेतकरी राजा देशोधडीला लागला आहे.त्यामुळे लॉकडाऊन पाहता शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी शेती पिकवण्यासाठी घेतलेले सरकारी बॅंकांचे कर्ज व वीजबिल हे शंभर टक्के माफ केले जावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असा आग्रह धरून नाबार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी 30 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची सरकारने तरतूद केलेली आहे. या शिवाय नाबार्ड 90 हजार कोटी रुपये देत आहेत. म्हणजेच 120 हजार कोटी रुपये शासन व नाबार्ड मिळून 3 कोटी छोट्या व शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्याचा मानस आहे. परंतु ते कर्ज वितरण न करता शेतकऱ्यांच्या नावावर असलेले कर्ज व वीज बिल जर माफ केले तर खऱ्या अर्थाने शेतकरी बळीराजाला येथून पुढील वाटचाल व जीवन जगण्याचा मार्ग सोईस्कर होईल. या सर्व विषयांचा गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये 450 ते 600 रुपये क्विंटल या प्रमाणे मातीमोल भावाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात आहे. त्या ऐवजी शासनाने किमान 1400 ते 1500 या बाजार भावाने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा व नुकसान झाल्यास शासनाने ती सोसावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, असे धोरण स्वीकारले पाहिजे असेही त्यांनी त्यात म्हटले आहे. या निवेदन प्रती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसूलमंत्री, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी, तहसीलदारांना दिल्या आहेत.