नवी दिल्ली – पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि संजीव राजपूत या नेमबाजांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय नेमबाज सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांतून पदकाविनाच मायदेशी परतणार आहेत.
भारताच्या नेमबाजांना 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्येही एकही पदक जिंकता आले नव्हते. विश्वकरंडक स्पर्धा, राष्ट्रकुल आणि एशियाड या सर्वच स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या नेमबाजांकडून यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वांत जास्त पदकांची अपेक्षा होती. मात्र, त्यांना एकही पदक मिळवता आले नाही. त्यांच्या याच कामगिरीची चौकशी केली जाणार असून, त्यात खेळाडूंचीच चूक असल्याचे समोर आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे संकेत भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिले आहेत.
भारताच्या नेमबाजांनी ऑलिम्पिकची सांगताही निराशाजनक निकालांसह केली. सोमवारी झालेल्या पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि संजीव राजपूत या भारतीय नेमबाजांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे भारतीय नेमबाज सलग दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांतून पदकाविनाच मायदेशी परतणार हे आता निश्चित झाले आहे.
भारताच्या नेमबाजांना 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये एकही पदक जिंकता आले नव्हते. भारताचे तब्बल 15 नेमबाज यंदाच्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात होती. भारतीय नेमबाज एकही पदक जिंकू शकले नाहीत. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सौरभ चौधरी वगळता भारताच्या एकाही नेमबाजाला पात्रता फेरीही ओलांडता आली नाही.