ओबीसी आरक्षणाबाबतच्या निकालांवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले;” दोन वर्ष…”

नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाचा पूर्ण निकाल अद्याप मी पाहिलेला नाही! पण, प्राथमिक माहितीनुसार, कार्यकाळ 5 वर्ष पूर्ण झाला आणि 6 महिन्यांहून अधिक प्रशासक ठेवता येत नाही. या कारणामुळे अशा सर्व ठिकाणी निवडणुका जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे फडणवीस म्हणाले की, हे संपूर्णत: महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. दोन वर्ष या सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले. ट्रिपल टेस्ट केली नाही. त्यामुळेच अशाप्रकारचा निकाल आला. न्यायालयाने नवीन कायदा रद्द केला नाही. पण, सरकारच्या कार्यपद्धतीवर मात्र तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत.

या निर्णयामुळे ओबीसींची अपरिमित हानी होणार आहे. योग्य भूमिका महाविकास आघाडी सरकारने कधीच मांडलेली नाही. जी कार्यवाही करायला हवी होती, ती सुद्धा केलेली नाही. हा संपूर्ण निकाल आम्ही समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील भूमिका मांडू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.