नवी दिल्ली –भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी असणाऱ्या पाठिंब्याची लाट आणखी मजबूत बनत चालल्याचे मतदानातून दिसून येतेयं. केंद्रात एनडीएचे भक्कम सरकार हवं असल्याचा निर्णय देशातील जनतेने घेतला आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान झाले. त्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांचे मोदींनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे आभार मानले. विरोधकांच्या इंडिया आघाडीने कुठल्याही प्रकारचे मतपेढीचे राजकारण केले तरी जनता विश्वास ठेवणार नाही, अशा शब्दांत मोदींनी विजयाबद्दल खात्री व्यक्त केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर एनडीएच्या विजयाची ग्वाही देताना थेट आकडाच नमूद केला. पाचव्या टप्प्यानंतर एनडीएच्या खात्यात ३१० जागा जमा झाल्या आहेत. सहाव्या आणि सातव्या टप्प्यांनंतर आम्ही ४०० पेक्षा अधिक जागा मिळवू, असा दावा शहा यांनी ओडिशामधील सभेत बोलताना केला.