नवी दिल्ली : पुद्दुचेरीत काँग्रेस आज मोठा धक्का बसला आहे कारण बहुमत चाचणीत राज्य सरकार अपयशी ठरल्याने सरकार कोसळले आहे. बंडखोर आमदारांमुळे पुद्दुचेरीत काँग्रेसला आपली सत्ता गमवावी लागली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री नारायणसामी यांना आपला राग अनावर झाला आहे. बहुमत ठराव मांडण्याआधी नारायणसामी यांनी, “पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय असल्याची टीका केली होती.
नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचे जाहीर केले. दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे.
Puducherry Chief Minister submits resignation to the Lieutenant Governor after losing majority in the Assembly pic.twitter.com/Y2posu1zXQ
— ANI (@ANI) February 22, 2021
मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टीका केली असून संधीसाधू म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असे म्हटले आहे. “आमदारांनी पक्षासोबत निष्ठा राखली पाहिजे. राजीनामा देणारे आमदार आता लोकांना सामोरे जाऊ शकत नाहीत कारण त्यांना संधीसाधू अशी हाक मारली जाईल,” अशी टीका नारायणसामी यांनी केली आहे.
The Speaker's ruling is incorrect. BJP govt at the Centre, NR Congress & AIADMK have succeeded in dislodging our govt by using voting power used by 3 nominated members. This is murder of democracy. The people of Puducherry and this country will teach them a lesson: V.Narayanasamy pic.twitter.com/mMkfBD0erQ
— ANI (@ANI) February 22, 2021
“पुद्दुचेरीत जे काही सुरु आहे तो राजकीय वेश्याव्यवसाय आहे. पण सत्याचाच विजय होईल,” असा विश्वास नारायणसामी यांनी बहुमत सिद्ध करण्याच्या आधी व्यक्त केला होता. नारायणसामी यांनी यावेळी भाजपा जबरदस्ती हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. “तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आम्ही दोन भाषांचा वापर करतो, पण भाजपा जबरदस्ती हिंदी लादत आहे,” असं ते म्हणाले आहेत.
“केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली असून पुद्दुचेरीमधील जनता आणि देश त्यांना धडा शिकवेल,” असा विश्वास नारायणसामी यांनी राज्यपाल भेटीनंतर व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.