“ज्यांच्यात नाही दम, ते रामदास कदम, करारा जबाब देण्यासाठी”; भास्कर जाधव यांचा सणसणीत टोला

मुंबई :  शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथे नुकतीच जाहीर सभा पार पडली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला होता. त्या सभेला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचे आयोजन केले आहे. पण, या सभेपूर्वी खेडमध्ये शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे.

ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची सभा झाली होती, तिथेच एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे. अशात खेडमधील रामदास कदमांच्या बॅनरने चर्चांना उधाण आले आहे. ‘विरोधकांच्या मनात नुसती आग कारण मैदानात उतरला आहे, ढाण्या वाघ,’ ‘करार जबाब मिलेगा’, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची खिल्ली उडवत टोले लगावले आहेत.

एक वृत्तवाहिनीशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “ज्यांच्यात नाही दम ते रामदास कदम. करारा जबाब देण्यासाठी तुमच्यात दम असायला लागतो. २००९ साली रामदास कदमांची पराभव मी नाहीतर उद्धव ठाकरेंची केल्याचा आरोप ते करत आहेत. दुसरं, योगेश कदमांची राजकीय कारकीर्द संपण्यासाठी उद्धव ठाकरेंची कट रचल्याचा आरोप रामदास कदमांनी केला. पण, रामदास कदम हे एका मतदारसंघापुरते मर्यादीत आहेत. हे काय करारा जबाब देणार.”

“त्यामुळे बेडूक कितीही फुगला तरीसुद्धा ती काय डोंगर किंवा बैल होऊ शकत नाहीत. रामदास कदम नावाची बेडूक किंवा शिंदे गट कोकणात बोलून फुगेल. निवडणुकीवेळी लोक हळूच टाचणी लावून हा फुगा फोडलीत,” असे टीकास्र भास्कर जाधव यांनी डागले आहे.