डुकरांनी पिक फस्त केल्याने तिघांची हत्त्या ! दोन कुटुंबातील वाद विकोपाला पोहचल्याने खूनखराबा

नवी दिल्ली – झारखंडची राजधानी रांचीमध्ये डुकरांनी शेतात घुसून पिकांची नासाडी केल्याच्या कारणावरून दोन महिला आणि एका पुरुषाला 10 जणांनी बेदम मारहाण केली. शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या ओरमांझी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झांझी टोला गावात ही घटना घडली. याप्रकरणी वेगाने कारवाई करत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.

रांची ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाच्य मालकीच्या डुकरांनी शेजारच्या शेतातील पीक नष्ट केल्यानंतर दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हातातल्या काठ्यांनी 10 जणांनी ही डुकरे ज्यांच्या मालकीची आहेत, त्या कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत 42 वर्षीय जनेश्वर बेडिया, 39 वर्षीय सरिता देवी आणि 25 वर्षीय संजू देवी मरण पावले. या तिघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी 14 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नाव असलेल्या 11 लोकांपैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.