…’त्या’ रुग्णांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ

मधुमेह, रक्‍तदाब रुग्णांना डोळ्यांच्या रक्‍तवाहिन्या बंद पडण्याची समस्या

पुणे – मधुमेह, रक्‍तदाब त्रास असलेल्या रुग्णांना डोळ्यांच्या रक्‍तवाहिन्याच्या बंद पडल्याने विशिष्ट इंजेक्‍शन्स घ्यावी लागतात. मात्र, आर्थिक अडचण आणि इंजेक्‍शन्समुळे दृष्टी फारशी सुधारत नसल्याच्या गैरसमजामुळे अनेक रुग्ण अर्ध्यावरच उपचार सोडून देतात. परिणामी, नियमित उपचाराअभावी रुग्णांना कायमची दृष्टी गमावण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे.

पुण्यासह दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, कोचीन, अहमदाबाद शहरांत डोळ्यांच्या स्वतंत्रपणे विशेष उपचार देणाऱ्या आठ रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षभरात संशोधन करण्यात आले. त्यात पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थोमॉलॉजी (एनआयओ) या रुग्णालयात हे संशोधन झाले. यात नेत्रतज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. राजा नारायणन यांचा मुख्य सहभाग होता.

डॉ. केळकर म्हणाले, “मधुमेही, रक्तदाब आणि बी-12 गुणसत्वाची कमतरता असलेल्या काही रुग्णांच्या डोळ्यांच्या आतील मुख्य रक्‍तवाहिनीच्या “रेटिना व्हेन ऑक्‍युल्युजन’ आजारामुळे रक्‍तवाहिन्या बंद पडतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या बंद पडल्यानंतर शस्त्रक्रिया करून त्या पूर्ववत करणे शक्‍य असते. तसेच डोळ्याच्या रक्तवाहिन्या बंद पडल्यावर शस्त्रक्रिया करता येत नाही. त्यावर इंजेक्‍शन घेण्याचा पर्याय आहे. परंतु, अनेकदा रुग्ण हे आर्थिक, रुग्णालयात ये जा करण्यास कंटाळून तसेच इंजेक्‍शनमुळे दृष्टी सुधारत नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे अर्धवट उपचार सोडून देतात. परिणामी, रुग्णांची दृष्टी जाते.

रक्‍तवाहिन्या बंद पडल्यानंतर रुग्ण उपचारांसाठी येत नाहीत. त्यामध्ये बहुतांश रुग्ण हे वृद्ध असतात. मधुमेह असल्यास त्यांना गॅंगरीन होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नेत्रतज्ज्ञ इंजेक्‍शन घेण्याचा सल्ला देतात. ते इंजेक्‍शन तीन महिने सलग तसेच गरजेनुसार नंतर घ्यावे लागते. या इंजेक्‍शनमुळे रुग्णाची आहे तेवढी दृष्टी टिकविण्यास मदत होते.
– डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ

Leave a Comment