“एका ठराविक समाजाला बदनाम करण्यासाठी…” ; जितेंद्र आव्हाडांची ‘त्या’ चित्रपटाच्या बंदीची मागणी

Jitendra Awad । मागील काही वर्षांपासून एखाद्या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच विरोध करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. याच ट्रेंडमध्ये सध्या  हमारे बारह’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून यावर वाद निर्माण झालाय. आता अनेक मुस्लीम संघटना आणि राजकीय पक्षांनी या चित्रपटाला विरोध दर्शवण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटावर बंदी घलण्याची मागणी केली आहे. तसेच एका ठराविक समाजाला बदनाम करण्यासाठी हा चित्रपट बनवला असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

…त्या व्यक्तीला मी ११ लाख रुपयांचं बक्षीस Jitendra Awad ।

जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाच्या बंदीची मागणी केलीय.याविषयी बोलताना,”जी कोणी व्यक्ती मला एका मुस्लीम व्यक्तीच्या घरात त्याची १० मुलं दाखवेल त्या व्यक्तीला मी ११ लाख रुपयांचं बक्षीस देईन. मुळात आता कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलं नाहीत. असं चित्र कुठेही नसताना लोकांमध्ये गैरसमज का निर्माण केला जातोय. कोणत्या धर्माच्या धर्मग्रंथात किंवा धार्मिक पुस्तकात असं लिहिलेलं नाही. हिंदू, मुस्लिम, शीख किंवा बौद्ध धर्मांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये असं कुठेही काहीही लिहिलेलं नाही. कोणी किती मुलं जन्माला घालावी हा त्या पती-पत्नीचा प्रश्न आहे. एखाद्या महिलेला अधिक मुलं नको असतील तर ती नकार देऊ शकते. तिला नकार देण्याचा अधिकार आहे.” असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली.

चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी Jitendra Awad ।

पुढे,”मुस्लिमांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिलं आहे की, पतीने पत्नीला विचारल्याशिवाय काहीच करू नये. हे सगळं इसवी सन ६२२ मध्ये लिहिलं आहे. त्यामधील एकही ओळ बदललेली नाही. मात्र काही लोक देवाच्या पुस्तकाची मोडतोड करू पाहत आहेत. कुराण हे देवाचं पुस्तक असून त्यातली माहिती खोट्या पद्धतीने मांडून चित्रपट काढून या लोकांना काय आनंद मिळतो हे मला कळत नाही. हे सगळं चालू असताना सेन्सॉर बोर्ड काय करतं, ते कोणाच्या हाताखाली काम करतं हे देवालाच ठावूक. त्यामुळे मला वाटतं की, सेन्सॉरने थोडं जबाबदारीने काम करायला हवं. मी तर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असे ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, या चित्रपटात दावत-ए-इस्लामी या संस्थेचा बॅनर वापरण्यात आला आहे. भारतभर या संस्थेच्या शाखा आहेत. परंतु, हा चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी चित्रपटात त्यांचा बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. सेन्सॉरने त्यावर चित्रपटकर्त्यांना प्रश्न विचारायला हवा होता. मी त्या संस्थेतील लोकांशी बोललो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, चित्रपटकर्ते किंवा सेन्सॉरने त्यांच्याशी संपर्क साधला नव्हता. आमची परवानगी न घेता त्यांनी चित्रपटात आमचा बॅनर वापरला आहे. त्यामुळे मी पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. मुळात देशात इतके सगळे मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत आणि हे लोक नवे प्रश्न उभे करत आहेत.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.