नगर – जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. शेतमजुरांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहेत. रोहयोंतर्गत जिल्ह्यात २ हजार ६०९ कामे सुरू असून १३ हजार ६५७ मजूर ही कामे करत आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत कामांसाठी मजुरांना नाव नोंदणी करावी लागते. नाव नोंदणी केलेल्या मजुरांना १०० दिवसांचा हक्काचा रोजगार दिला जातो. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते.
जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्तावित कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जिल्हा परिषद, कृषी विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या कामांचा या आराखड्यात समावेश होता. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात.
जिल्ह्यात रोहयोतून २ हजार ६०९ कामे सुरू आहेत. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाची २ हजार ३७१ तर वन, पाटबंधारे, बांधकाम या विभागांची २३८ कामांचा समावेश आहे. घरकुल, गोठे, सिंचन विहिरीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याशिवाय शोषखड्डे, रस्त्याची कामे, फळबागा या कामांचा समावेश होता. जिल्ह्यात सध्या रोजगार हमी योजनेवर जिल्ह्यात सर्वाधिक मजूर जामखेड आणि कर्जत तालुक्यातील आहेत. श्रीरामपूर तालुक्यात सर्वात कमी मजूर आहे.
वैयक्तिक स्वरुपाची कामे
प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल कामे, फळबाग लागवड, सिंचन विहीर, शेततळे, शोषखड्डे, कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी, अझोला खत/ जैविक खत निर्मित साचा, गुरांचा/शेळीचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेत बांध बंदिस्ती
तालुकानिहाय मजुरांची उपस्थिती कंसात कामे
अकोले -४८८ (११९), जामखेड – १ हजार ७४४ (८७१), कर्जत- २ हजार ३०७ (२९४), कोपरगाव – २१२(८९), नगर – ६९२(१५४), नेवासे – २९३ (४०), पारनेर -१ हजार ९२ (११४), पाथर्डी -१ हजार १७ (१०८), राहाता – २२१(५२), राहुरी -४४८(९७), संगमनेर -१ हजार २४१(२३६), शेवगाव – ३ हजार १७६ (२८६), श्रीगोंदे -५४६ (११६) व श्रीरामपूर – १८० (३३) मजुरांचा समावेश आहे.