महाराष्ट्रात ‘या’ भागाला पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. आजही विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर याउलट मुंबई, ठाणेसह कोकणाात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

यवतमाळ भागात टरबुज, उन्हाळी तीळ, ज्वारी, भाजीपाला पीकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवसापासून दररोज रात्री एक ते तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्यामुळे यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव या भागात जवळपास पाचशे हेक्टरवरील उन्हाळी तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे. तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली. ग्रामीण भागात विद्युत पुरवठा देखील खंडित झाला.

विदर्भात पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा –

विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. आता हवामान खात्याने विदर्भात पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या हंगामातील कपाशीचं पीक धोक्यात येणार असल्याची चिंता वाढत आहे.

परभणी शहरासह परिसरात जोरदार पाऊस –

परभणी शहरासह परिसरामध्ये रात्री जोरदार वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. परभणी शहरातील विविध भागांमध्ये जवळपास दहा ते पंधरा मोठे झाडं उन्मळून पडले. शहरातील वसंतराव नाईक पुतळा ते सुपरमार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यात तीन ते चार झाड म्हणून पडले होते. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या मार्गावरील वाहतूक अजूनही बंद आहे.