satara | चोरे परिसराचा पाणी प्रश्न निकाली काढू

कराड, (प्रतिनिधी) – तारळी धरणातून कराड तालुक्यातील चोरे भांबे परळी इंदोली या गावांना पाणी मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, ही मागणी आपण निकाली काढू असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

चोरे, ता. कराड येथे बाळासाहेब पाटील चोरेकर यांच्या निवासस्थानी रविवारी सायंकाळी उदयनराजेंनी भेट दिली. याप्रसंगी दत्ता पाटील चोरेकर, कराड उत्तर विधानसभा प्रचार प्रमुख मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

उदयनराजे म्हणाले, माझ्या मागणीनुसार 1996 मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन झाले आणि त्यातून जिल्ह्यामध्ये 11 धरणांची निर्मिती झाली. चारोळी धरणातून कराड तालुक्यातील गावांसाठी दोन टीएमसी पाणी मिळण्यासाठी येथे शेतकऱ्यांची मागणी आहे. निश्चितपणाने ही मागणी पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करेन.

बाळासाहेब पाटील सुरेकर म्हणाले, तारळी धरणासाठी आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने अल्प मोबदल्यात ताब्यात घेतल्या. चोरे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठे योगदान हे धरण बांधण्यासाठी देण्यात आले आहे.

तरी देखील अजूनही शेतकऱ्यांना कोरडवाहू पिकाशिवाय पर्याय नाही. तारळी धरणातील दोन टीएमसी पाणी मिळावे या मागणीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी राज्य शासनाकडे पाठवून दिला आहे. राज्य शासनाकडे सचिव स्तरावर हा विषय प्रलंबित आहे, तरी या विषयात उदयनराजेंनी लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.