महत्वाचा निर्णय होणार?; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारसह आरोग्य यंत्रणेच्या समोर नवे आव्हान निर्माण होत आहे. अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत लसीकरणाच्या मुद्द्यासह करोना संक्रमण रोखण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये करोना झपाट्याने वाढू लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशात आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येपैकी या आठ राज्यातील रुग्णांची संख्या ८१.४२ टक्के इतकी आहे.

सर्वाधिक रुग्णासंख्या असलेल्या देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बंगळुरू, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दहा जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे हे महाराष्ट्रातील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, केंद्रीय आरोग्य सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहे. डॉ. विनोद पॉल हे सुद्धा या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment