nagar | निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा

राहुरी, (प्रतिनिधी)- पाश्चात संस्कृतीमुळे तरुण वर्ग फास्ट फुडकडे आकर्षित होत आहे. फास्ट फुडमुळे आरोग्याची हानी होती. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या सकस आहाराची जोड दिलेली आहे.

विद्यार्थिनींनी आहारामध्ये फळे, भाजीपाला, पौष्टिक तृणधान्ये, कॅलशिअम आणि लोहयुक्त पदार्थांना प्राधान्य द्यावे. आहाराबरोबर योगाही तेवढाच गरजेचा आहे. निरोगी जीवनासाठी योगा आणि सकस आहार महत्वाचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने विद्यापीठ दवाखान्यात विद्यार्थीनींसाठी हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करताना अध्यक्षस्थानावरून अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे बोलत होते.

याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलव्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. महानंद माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. महानंद माने,डॉ. वैशाली हिले यांनी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनींची मोफत हिमोग्लोबीन तपासणी करण्यात येऊन त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला. आभार प्रतिक्षा शिरसाठ हिने मानले.