नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – ‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण संपायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु असताना दुसऱ्याकडे नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फणी चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये पोहचले. यावेळी केंद्र सरकारने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आढावा बैठकीचा प्रस्ताव ठेवला. परंतु, ममता बॅनर्जींच्या सरकारने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मधील झारग्राम येथे बोलताना, नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नसल्यानेच बैठकीस नकार दिल्याचे म्हंटले आहे.

दरम्यान, ओडिशानंतर नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधेय आढावा बैठक घेऊ इच्छित होते. तसा प्रस्तावही ममता बॅनर्जी यांच्या सरकारपुढे ठेवण्यात आला होता. परंतु, सध्या राज्याचे सर्व अधिकारी निवडणूक कार्यात व्यस्त असल्यामुळे आढावा बैठक घेता येणार नाही, असे उत्तर पश्चिम बंगाल सरकारकडून देण्यात आले.  फणी चक्रीवादळसंदर्भात माहिती घेण्यासाठी रविवारीही पंतप्रधान कार्यालयाने ममता बॅनर्जी याना दोन वेळा फोन केला होता. परंतु, त्या फोनवर आल्या नाहीत. मुख्यमंत्री ममता यांच्याशी चर्चा न झाल्यानेच अखेर मोदींनी राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती.

त्यामुळे ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार यांच्यामधील वाद कोणत्याही परिस्थतीमध्ये निवळण्याची चिन्हे नसल्याचे दिसत आहे. आज नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ममता बॅनर्जी यांनी आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नसल्याचे सांगून, त्यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर पाहण्याची देखील इच्छा नसल्याचे म्हंटले आहे. शिवाय आम्ही चक्रीवादळाच्या नुकसानीची काळजी घेऊ शकतो, असे सांगत निवडणुकीच्या आधी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नसल्याचे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.

Leave a Comment