nagar | लोकसभा निवडणुकीमुळे झेडपीच्या बदल्या लांबणार

नगर, (प्रतिनिधी) – दरवर्षी मे महिन्यांत होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचार्‍यांच्या बदल्या यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणार आहेत. जून महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सुचनानूसार बदल्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहेत.

दरम्यान, चालू आठवड्यात बदली पात्र (प्रशासकीय) आणि विनंती बदलीसाठी पात्र कर्मचार्‍यांची माहिती संकलित करण्यासाठीचे पत्र काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी १ ते १५ च्या दरम्यान जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या होत असतात. कर्मचार्‍यांच्या बदल्याचा विषय हा जिल्हा परिषद प्रशासनासाठी हॉट विषय असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषद आणि पंचायतीवर प्रशासक राज असल्याने राजकीय हस्तक्षेप काही प्रमाणात कमी झालेला असला तरी पूर्णपणे थांबवलेला नाही. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे कर्मचार्‍यांचा बदल्याचा विषय लांबणीवर पडणार आहे.

कोविड काळात अशा प्रकारे मे महिन्यांत होणार्‍या कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ऑगस्ट महिना उजाडला होता. दरवर्षी कर्मचार्‍यांच्या बदल्याची प्रक्रिया होणे आवश्यक असून ती न राबवल्यास बदली पात्र असणार्‍या कर्मचार्‍यांवर अन्याय असल्याने ग्रामविकास विभाग कालावधी लांबला तरी बदल्यांची प्रक्रिया राबवत असल्याचे आजपर्यंत प्रशासनाचा अनुभव आहे.

असे असले तरी ग्रामविकास विभाग कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी दरवर्षी स्वतंत्रपणे आदेश काढत असतात. ग्रामविकास विभागाच्या आदेशाशिवाय कर्मचार्‍यांच्या बदल्या होत नाहीत. या आदेशात प्रशासकीय आणि विनंती बदल्याचे प्रमाण राज्य पातळीवरून निश्‍चित करून देवून ते राज्यातील जिल्हा परिषदेत एकसारखे राबवण्यात येते. यात साधारणपणे 5 टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या होत असतात.

यंदा मे महिन्यांत लोकसभा निवडणूक आली आहे. १३ मे रोजी नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर मतदारसंघात निवडणूक होणार आहे. तर राज्यात पाच टप्प्यात मतदान झाल्यावर जून महिन्यांत एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीची आरचासंहिता संपणार असून त्यानंतर १५ दिवसात राज्याचे ग्रामविकास विभाग कर्मचार्‍यांच्या बदल्याच्या धोरणाबाबत आदेश काढणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान, ऐनवेळी अडचण नको यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आताच बदली पात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करणार आहे.

यासाठी सेवाज्येष्ठेनूसार आणि संवर्गनिहाय कर्मचार्‍यांना त्यांची माहिती ऑनलाईन पध्दतीने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावी लागणार आहे. ही माहिती तपासून झाल्यावर प्रशासकीय आणि विनंती बदलीसाठी पात्र असणार्‍यांची विभागनिहाय यादी सामान्य प्रशासन विभाग तयार करून ठेवणार आहेत. ही माहिती भरण्याबाबतचे पत्र चालू आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल शेळके यांनी दिली.